समोरचा कित्येकदा हे विसरून जातो की प्रत्येक व्यक्ती हे वेगळं व्यक्तिमत्व आहे तिचं स्वतःचा असं एक आयुष्य आहे आणि ते त्या व्यक्तीला निसर्गानेच किंवा नियतीने जगण्याचा हक्कं दिलेला आहे. सल्ला जरूर द्या कळकळ वाटते म्हणून , त्या विषयातील ज्ञान आहे म्हणून नाहीतर तो दिल्याशिवाय रहावत नाही म्हणून. पण त्याच सल्लाबरहुकुम वागलं पाहिजे असा हट्ट धरून एखादा बसला तर तीही एक प्रकारची बळजबरी असते.तुम्ही नकळत हुकुमशाहाच्या भूमिकेत शिरत असून दुसऱ्याला गुलाम ठरवत आहात हे लक्षात घ्या. एखादा अडचणीत सापडला कि मदत करणे तर दूरच पण स्वतःचा अहं सुखावण्यासाठी स्वतःला जो पटेल तो सल्ला द्यायचा अन देताना समोरच्याचा विचारही करायचा नाही वर त्या व्यक्तीने तो सल्ला मानलाच पाहिजे कारण ज्या अर्थी तो अडचणीत आहे त्या अर्थी तो चूक आहे आणि केवळ नशिबाने तुमच्या आयुष्यात आत्ता काही अडचण नाही म्हणून तुम्ही बरोबर हे ठरविण्याचा अधिकार कुठून प्राप्त होतो हे मला तरी न उलगडणारं कोडं आहे . अर्थात शक्तिमान लोक वर्चस्व गाजवतात हाही जगाचा एक नियम आहे आणि कोणाच्याही सक्तीपुढे मान न तुकवता आपल्या मनाला जे योग्य वाटेल बुद्धीला पटेल तसंच वागणं हे माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे. इतरांबाबतची कित्येक कर्तव्यं आपण नाईलाजास्तव पूर्ण करतो मग स्वतःसाठी एखादं कर्तव्यं पार पाडायला काय हरकत आहे ? कधीतरी ( खऱ्या अर्थाने ) " स्वार्थी " व्हावंच लागतं. या जगात जगायचं असेल तर हाही एक नियम आहे.
---- © वैभवी भिडे
१० जानेवारी २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा