एखादा क्षण पुरेसा असतो आपल्या मनाचा तळ ढवळून काढायला आणि या मंथनातून कितीक आणि कसले अवशेष बाहेर येतील सांगू शकत नाही. तशी मी सहसा हळवी होत नाही पण जेव्हा मला माझ्या आजी नानांची आठवण येते तेव्हा ना मला या माझ्या कणखर इमेजची चौकट अडवू शकते ना कुठल्या जगाची पर्वा. " माझे नातेवाईक " असं ज्यांना मी हक्काने म्हणू शकेन अशा या दोनच व्यक्ती होत्या ( बाकी रक्ताचा एखादा भाग सारखा म्हणून नाईलाजाने लादले गेलेलेच जास्ती ). म्हणून तर शेवटच्या क्षणात जेव्हा आजी माणसांना ओळखत नव्हती, तेव्हा तिने कधीच मला ज्या वेशात पहिला नव्हता अशा जीन्स अन शर्ट पेहारावातही " अरे ही तर आमची वैभवी " हे तिच्या तोंडून ऐकताना माझी मन ताठ झालेली ती बुकर किंवा ज्ञानपीठ पुरस्कार मला कोणी जाहीर केला तरी होऊ शकणार नाही.
निमित्त झालं ते एका मित्राला आजी गेल्याची तारीख मी चुकीची सांगितल्याचं अर्थात त्याही दिवशी मी ते विसरलेलेच आणि मग लक्षात आलं मी बरंच काही विसरले आहे. त्या दोघांची आवडनिवड , रंग , पदार्थ काही म्हणून काही आठवत नाहीये मला.
एकदा हातावर मेंदी काढलेली म्हणून आजीने भरवलेली मुगाची खिचडी ती चव मी एकदाही माझ्या खिचडीत उतरवू शकले नाहीये हे लक्षात आहे माझ्या. किंवा नानांना "आताशा तुम्ही पत्रं का लिहीत नाही ?"म्हणून खुपदा झापल्याचं आठवतंय. माझी सुरवातीला लिहिलेली कविता त्यांनी आपटे कुलांच्या मासिकात छापून आणलेली " माझ्या नातीची इयत्ता १० वीत केलेली कविता ".
ते असताना आपण किती गृहीत धरून चालतो कि ते असेच रहणारेत कायम आपल्यासाठी आणि मग एखाद दिवस अचानक आपला स्पर्श करून देतो त्यांच्या थंड पडलेल्या कलेवराला आणि आपला काळही गोठून जातो त्या एका क्षणात.
मग अजून काही क्षण येतात एखादी चिमुरडी आजी सोबत महादेवाला पाणी घालायला जाताना दिसते किंवा आजोबांच्या मांडीत बसून अथर्वशीर्ष म्हणताना ऐकू येते आणि जाणवतं क्षण कायम प्रवाही असतात पिढ्यानपिढ्या फक्त त्यातले माणसांचे संदर्भ बदलतात. मग अशा या चिरंतन चक्राचे आपण सदस्य आहोत जाणवल्यावर तारखांचे दाखले घेऊन आठवणी येत नाही आणि मनातला हळवा कोपरा आपल्यापुरता मर्यादित रहात नाही.
---- © वैभवी भिडे.
( २४ फेब्रुवारी २०१५ )
( २४ फेब्रुवारी २०१५ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा